Friday, 23 June 2017

पच्चीसी, चौसर

पच्चीसी, चौसर 

आपल्याला कोणी विचारलं आपला राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय फुल कोणता तर आपण चटकन उत्तर देतो. पण आपला राष्ट्रीय बैठा खेळ कोणता ? असं कोणी विचारलं तर मी त्यांना उत्तर देईन “चौसर”, “चौपट” किव्हा “पच्चीसी”. भारतीय इतिहासात ज्या खेळाने हे मानाचे स्थान पटकावले तो हा खेळ भारतात फार पूर्वी पसून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या शिल्पातून, चित्रातून आणि विविध संदर्भात “चौसर” अथवा “पच्चीसी” ह्या खेळाचे उल्लेख आढळतात. ह्या खेळाचे ठोस संदर्भ १५ व्या व १६ व्या शतकात जरी सापडत असले तरी हा खेळ पुराण काळापासून प्रसिद्ध आहे.
वेरूळ येथील मंदिरातील शिल्प 

देवी देवतांच्या भक्तीकथा आपल्याला ज्ञात आहेतच, महादेव शंकर व देवी पार्वती ह्यांचा हा आवडता खेळ मानला जातो तसे पुरावे प्राचीन मंदिराच्या शिल्पात आपल्याला पाहायला मिळतात. असंच एक शिल्प वेरूळ (ELLORA) येथील शिवमंदिरात आपल्याला पाहायला मिळतं. विजयनगर साम्राज्यातील हम्पी ह्या ठिकाणी व कर्नाटकातील विविध मंदिरात ह्या खेळाचे कोरीव अवशेष पाहायला मिळतात.

चौसर, चौपट, पच्चीसी
पच्चीसी किव्हा चौसर हा खेळ चार जणांमध्ये खेळला जातो. पटावर प्रत्येक प्रतिस्पर्ध्याची चार प्यादी मांडलेली असतात. लाल, हिरवा, पिवळा आणि कला अशी एकूण १६ प्यादी असतात. मधील चौकोनात लाकडी पासे ठेवलेले असतात त्या मध्ये १, ३, ४ व ६ असे गुण असतात. प्रत्येक प्रतिस्पर्धी आपली प्यादी पडलेल्या गुणांवर चालवतो आणि शेवटच्या घरात जाण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना प्रतिस्पर्ध्याच्या प्याद्यला छेद द्यायचा असते. नाशिब आणि नियोजन कौशल्याने परिपूर्ण असलेल्या ह्या खेळात डावपेच खेळत हा खेळ जिंकायचा असतो.

ह्या खेळाचे नियम प्रांता-प्रांतात, जागो-जागी बदलताना दिसतात. भारताप्रमाणे इतर देशात देखील हा खेळ प्रसिद्ध आहे. भारत ह्या खेळचा जनक असून हा खेळ चीन मध्ये “शुपु” ह्या नावाने प्रसिद्ध आहे. कोरिया मध्ये हा खेळ गोलाकार पटावर खेळला जातो व त्याला “नेआऊट” असे म्हणतात.चीनच्या मते हा खेळ तिसऱ्या शतकात चीन मधून कोरिया मध्ये गेला पण भारतात ह्याचे अस्तित्व त्या ही अगोदरचे आहे ह्याचा अर्थ “शुपु” व “नेआऊट” हे खेळ भारतामधून तिथे गेले. सन १८६० मध्ये हा खेळ इंग्लंड व अमेरिकेत दाखल झाला. बदल करण्यात तरबेज असलेले इंग्रज ह्यांनी नवीन आवृती काढत त्याचे “लुडो” असे नामकरण केले. ह्यातील दोन पासे काडून त्यात एकच पासा खेळण्यासाठी वपरला, त्यावर १ ते ६ हे गुण आहेत, त्याला आपण DICE असे म्हणतो.

भारतावर कित्येक राजवटींनी राज्य केलं ते करत असताना येथील संस्कृती आत्मसात केली व काही मध्ये बदल करत ती टिकवण्याचा प्रयत्न देखील केला. 


फतहपूर सिक्री - दिवान-ए-खास मधील पच्चीसी 
अश्याच मुघल राजवटीत ह्या खेळाचे भव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. आग्रा येथील फतहपूर सिक्री मधील दिवान-ए-खास मध्ये आपल्याला हा खेळ पाहायला मिळतो. अकबर बादशाह च्या दरबारात हा खेळ दिमाखात खेळला जात असे. लाल आणि सफेद दगडांनी बनवलेला हा सर्वात मोठा पट ६६.२९ x ४६.९३ चौ.मीटर चा आहे. त्याच्या मधोमध १.४७ x १.२९ मीटर्स चा दगडी चौथरा आहे ज्यावर पासे टाकले जात असत.रंगीत कपडे परिधान करून दरबारातील गुलामांना त्यावर प्यादे म्हणूण वापरलं जाई. “अकबरनामा” प्रमाणे हा खेळ उच्च उदिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी खेळला जात असे प्रतिस्पर्ध्याची प्रतिभा तो ह्यातून तपासात असे. कधी कधी हा खेळ तीन तीन महिने चालत असे. काळानरूप ह्या खेळात बदल होत गेले कधी पट, कधी प्यादे तर कधी पासे ह्याची रूपे बदलत गेली पण खेळाचा गुणधर्म तोच राहीला. आजही काही ठिकाणी हा खेळ दिवाळीत खेळला जातो कुठे मनोरंजनासाठी तर कधी जुगारासाठी.

माझ्या एका मित्राने सांगितलेली एक गोष्ट आठवते. त्यांच्या गावातील शंकर मंदिरात रोज रात्री देवाच्या गाभार्यात चौपट ठेवला जातो त्यावर पासे ठेऊन, प्यादे मांडले जातत त्या समोर देवी पार्वतीची मूर्ती ठेवली जाते आणि मंदिराचे दार बंद केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दार उघड्ताच त्या पटावरील पासे फिरलेले असतात, प्याद्यांची चाल चाललेली असते जणू काही रात्रभर शंकर व देवी पार्वती ह्या दोघां मध्ये हा खेळ रंगलेला आहे. सत्य काय ते माहित नाही पण कुठली तरी अदृश शक्ती असावी जी ह्या न त्या रूपाने ह्या खेळाचे अस्तित्व व पावित्र्य टिकवण्याच्या प्रयत्नात आहे आणि आपल्याला हि ते दर्शवत आहे.