Monday, 5 February 2018

आट्यापाट्या


आट्यापाट्या

शारीरिक व्यायाम ज्या मध्ये धावणे हा एक महत्वाचा घटक मानला जातो आणि ज्या खेळां मध्ये ह्या धावण्याचा समावेश होतो तो म्हणजे आट्यापाट्या. मुलांचे शारीरिक स्वास्थ्य अधिक बळकट करण्यासाठी व्यायाम हा हवाच आणि आट्यापाट्या ह्या खेळांमध्ये धावणे, हुलकावणी देणे, अडवणे ह्या मुळे सर्व शारीरक हालचाली होतात. आट्यापाट्या हा मैदानी खेळ असून एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेत (पट्टीत) अडविणे व अडवलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटणे अशी रुपरेषा असलेला हा महाराष्ट्रातील खेळ आहे. पूर्वी ह्या खेळासाठी सर्वसामान्य नियम नव्हते. पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने ह्या खेळा मध्ये सुधारणा करत १९१४ साली अधिकृत व नियमबद्ध अखिल भारतीय सामने सुरु केले. १९१८ मध्ये बडोदा येथील हिंदविजय जिमखान्याने देखील काही वेगळे नियम लागू केले. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने ह्या खेळला आधुनिक, आकर्षक, संघटीत अ शिस्तबद्ध स्वरूप दिले. आता ह्या नियमानुसारच हा खेळ सर्वत्र खेळला जातो. सूर-पाती, लोन-पाती, दर्या-बंध, सारागरी, सारामणी, तिल्ली, उप्पीनाट, उप्पू-पत्ती, चौपाल-पाती, पंचवटी, चिक्का आदी विविध नावांनी हा खेळ खेळला जातो. आदिवासी भागात ह्या खेळला ‘लाभ’ म्हणून संबोधले जाते. तामिळनाडू राज्यातील पुरातन तामिळ साहित्यात या खेळाचे किलीथाटूअसे नमूद केलेले आहे अजूनही तिथे शेतामध्ये हा खेळ खेळला जातो. संत तुकाराम ह्यांच्या काळात हा खेळ प्रचलित होता असे त्यांनी केलेल्या त्यांच्या अभंगातून व्यतीत होतं.

आट्यापाट्यांचे क्रीडांगण नियमानुसार सुरपाटी व इतर नऊ पाट्यांत विभागलेले असतात. खेळ जिथून सुरु होतो त्या पाटीला कपाळपाटी असे म्हणतात. शेवटच्या पाटीला लोणपाटी असे म्हणतात. सर्व पाट्यांना दुभागून जाणाऱ्या पाटीस सुरपाटी किवाह मृदुंगपाटी असे म्हणतात. खेळाडूंचे दोन संघ असतात व त्यात प्रत्येकी नाऊ खेळाडू असतात. खेळीत खेळणारे (लोणवाले) कपाळपाटीकडून लोणपाटीकडे खेळत जाऊन लोणपाटीकडून उलटून कपाळपाटीकडे खेळत येतात. त्यांनी कपाळपाटी ओलांडली, की लोण होते. प्रतिपक्षातील खेळाडू (पाटीवाले किंवा पाट्या धरणारे) पाट्यांवर उभे राहून लोणवाल्यांना अटकाव करून लोण न व्हावे असा प्रयत्न करतात. लोणांवरच डावाचा निर्णय अवलंबून असतो. सूरवाल्याला प्रतिस्पर्ध्यास चोहोंकडून कोठेही मारता येते; पण पाटी धरणाऱ्या खेळाडूस मात्र प्रतिस्पर्धी मागच्या घरात गेल्यानंतर मारता येत नाही.

१९४८ मध्ये या स्पर्धा फार मोठय़ा प्रमाणात पार पडल्या. मात्र त्यानंतर म्हणजे १९४८ नंतर अखिल भारतीय स्तरावर या खेळाला लोकप्रियता किंवा मान्यता मिळवून देण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. याचा परिणाम असा झाला की अतिशय वेगवान, आकर्षक आणि चुरशीचा असा हा खेळ स्पर्धा जगाच्या व्यासपीठावर मागे पडला. अजूनही अगदी मोजक्या ठिकाणी लहान लहान मंडळे या खेळाचे सामने आयोजित करतात. इतक्या मर्यादेपर्यंत हा खेळ मागे पडला.

आटय़ापाटय़ा खेळातील काही नामवंत खेळाडू तसेच या खेळाविषयी आस्था असलेले क्रीडाप्रेमी एकत्र आलेया खेळाचे पुनरुज्जीवन करून त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्याच्या हेतूने त्यांनी १९८२ मध्ये दिल्ली येथे सभा घेतली. याचा परिणाम म्हणून १९८२ मध्ये पहिल्यांदा आशियाई खेळांदरम्यान आटय़ापाटय़ा फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. तब्बल ३४ वर्षांच्या खंडानंतर या खेळाच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आणि १९८२ मध्ये पहिली राष्ट्रीय आटय़ापाटय़ा स्पर्धा झाली. आटय़ापाटय़ा फेडरेशन ऑफ इंडियाला आटय़ापाटय़ा खेळाचे मूळ इतर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात आढळले. दिल्ली, हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर, ओरिसा, केरळ, गोवा आणि इतर अनेक ठिकाणी हा खेळ रुजविण्यास मदतच झाली.
हा खेळ मनोरंजक, भरपूर व्यायाम करून देणारा व बिनखर्ची आहे. वैयक्तिक चापल्य व सांघिक कौशल्य यांची कसोटी यात लागते. तसेच शारीरिक व मानसिक अनुसंधानाचेही शिक्षण ह्या खेळामुळे मिळते.

संदर्भ : मराठी विश्वकोश ० धारूरकर. य. ज, लोकसत्ता नाशिक वृतांत 



  

No comments:

Post a Comment