Thursday, 17 November 2016

चतुरंग

चतुरंग 

साजी चतुरंग वीर रंगमे तुरंग चढी.....ह्या अलंकारबद्ध ओळीत चतुरंग म्हणजे चतुरंग सैन्य ज्या मध्ये पायदळ, घोडदळ, उंट आणि हत्ती आहेत आणि हे सैन्य घेऊन एक राजा लढाईस निघाला आहे. हेच प्रतीकात्मक चतुरंग सैन्य एका पटावर मंडलं तर त्याचा एक पुरातन खेळ होतो तो म्हणजे “चतुरंगा”.

८ X ८ च्या चौरस बुद्धिबळा सारख्या पटावर खेळला जाणारा हा खेळ दिसायला जरी आजच्या युगातील बुद्धीबळा सारखं असला तरी ह्या खेळाचे नियम वेगळे आहेत. हा खेळ दोन जणां मध्ये खेळण्या ऐवजी चौघांमध्ये खेळला जातो. जोडीने खेळला जाणारा हा खेळ सुमारे ३९०० वर्ष जुना आहे असे काही दंतकथा मधून निष्कर्ष काढला जातो तसेच ह्या खेळाचा उल्लेख ‘भविष्य पुराण’ ह्या ग्रंथात आढळतो. भारतात ह्या खेळाचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे. एका दंतकथे नुसार हा खेळ मंदोदरी म्हणजेच लंकाधीश रावण ह्यांची भार्या ह्यांनी बनवला आहे असे मानले जाते. भविष्य पुराणातील एका सूची वरून व्यास ऋषी ह्यांनी ह्या खेळाचे वर्णन करताना सूर्याची उपमा देऊन लाल, हिरवा, पिवळा आणि काळ्या हे प्रतिस्पर्ध्यांचे रंग म्हणून वापरलेले आहेत.

राजा, हत्ती आणि घोडा हे समान्य बुद्धीबळा सारखे चाल करतात. उंट मात्र पटावरील कुठल्याही सैन्यावरून उडी मारू शकतो. राजा, हत्ती आणि घोडा हे एकमेकांना व उंट आणि प्याद्याला चीत करू शकतात. पण ह्या उलट उंट आणि प्यादे हे एकमेकांशिवाय दुसऱ्या कोणालाही चीत करू शकत नाही. हा खेळ पासे (Dice) वापरून खेळला जातो त्याला “डल्ला” असे देखील म्हणतात. डल्ला च्या चारी बाजूस १, ३, ४ आणि ६ टिंब असतात. एक अंक पडले तर उंट चालतो, तीन असतील तर घोडा चालतो, चार असतील तर हत्ती चल करतो आणि सहा अंक पडलेले असतील तर राजा किव्हा प्यादा चालतो. प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही राजे जेव्हा मारले जातात तेव्हा खेळ संपतो. checkmate सारखे प्रकार ह्या खेळत होत नाही. आधुनिक बुद्धिबळाचा हा भारतीय खंडातील जुना प्रकार असून देश विदेशातील अभ्यासकांनी ह्या खेळाचा अभ्यास केला आहे. सर विल्यम जोन्स ह्यांनी ह्या खेळावर एक लेख १७८८ मध्ये प्रसिद्ध केला होता. चार बाजूनी खेळला जाणारा हा खेळ म्हणूनच कि काय “चारो खाणे चीत” हा वाक्यप्रचार रुजू झाला. भारताप्रमाणे इतर देशात म्हणजे इटली, जपान चीन मध्ये ह्याच chess चे विविध प्रकार पाहायला. LUDUS हा खेळ देखील बुद्धिबळाचा एक प्रकार आहे. बुद्धीला चालना देणारा डाव पेच शिकवणारा आणि नियोजन कौशल्य वाढवणारा हा खेळ कालानारूप बदलत गेला आणि अस्तित्व हरवून बसला.

चतुरंग...चदुरंग...शतरंग आणि शतरंज ही बदलत गेलेली नावे तर नाहीत ? हे कोडं काही सुटलेले नाही.                   

Friday, 11 November 2016

मंकला

मंकला

मंकला, वारी, सातगोल 

गणित म्हटलं की सर्वांच्याच डोक्यला आठ्या पडतात,विशेष करून एखादे पालक आपल्या पाल्याकडून पाढे पाठ करून घेत असतात तेव्हा. काही वेळेस स्वताला पाठ नसलेला पाढा जेव्हा आपल्या मुलाच्या तोडून वदवून घ्यायचा असतो तेव्हा तर भलतीच पंचाईत होते. पण आज कालची मुलं खूप शार्प आहेत तंत्रज्ञान विकसित आहेत त्यामुळे काळाच्या पुढे जाऊ इच्छितात, विविध प्रकारची उपकरणं हाताळतात. क्यालकुलेटर पासून कॉम्पुटर पर्यंत आणि मोबईल पासून टॅब पर्यंत सर्व उपकरणांशी हि मुले अवगत आहेत आणि ह्या मुळेच त्यांना गणित हा विषय काही अंशी सोप्पा झालेला दिसतो. आताच्या युगातील abacus हे देखील एक प्रचीन तंत्रज्ञान आहे जे शाळेत शिकवले जाते. पण खेळ आणि त्या मध्ये गणिताचा समावेश, ह्याचं एक उदाहरण दाखल एक बैठा खेळ आहे ज्यामध्ये गणितातील बेरीज वजाबाकीचा उपयोग करून खेळ खेळतात. वारी किव्हा मंकला हा खेळ अश्याच अंक मोजणी व बेरीज वजाबाकी म्हणजेच गणिताशी संबंधित आहे.

मंकला हा खेळ जगभरात सर्वत्र खेळला जातो विशेष करून आफ्रिकेत हा खेळ खूप प्रचलित आहे. सुमारे ३५०० वर्ष पूर्वीचे संदर्भ आणि अवशेष ईजिप्त मध्ये आढळलेले आहेत. पुरातन ईजिप्त मधील Luxor, Karnak ह्या वास्तूं मध्ये ह्या खेळाचे अवशेष पहायला मिळतात. कालांतराने ह्याचा प्रसार आफ्रिका पासून मध्य आशिया, दक्षिण आशिया खंडात झाला. बाराव्या शतका पर्यंत ह्या खेळाचे सुमारे २०० प्रकार अस्तित्वात होते असे काही संदर्भ सापडलेले आहेत. आफ्रिकेतील काही लोकं समुद्र मार्गाने ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी त्यांनी ह्या खेळाचा प्रसार केला. Thomas Hyde ह्यांनी १६९४ मधील त्यांच्या प्रवासवर्णनात आफ्रिका व आशिया खंडातील खेळ म्हणून ह्या खेळाचा उल्लेख केलेला आहे. Chicago येथे १८९४ मध्ये भरवलेल्या पुरातन वस्तू प्रदर्शना नंतर हा खेळ अमेरिकन लोकां मध्ये प्रसिद्ध झाला.

दुर्गराज रायगडावरील सापडलेला पट

भारत देशाने असेच काही खेळ आपलेसे केले. हा खेळ भारतात केव्हा रुजू झाला ह्याचा उल्लेख सापडत नाही,पण वेगवेगळ्या राज्यात ह्या खेळला वेगवेगळी नवे आहेत. अलीगुली माने, चिने माने, हरलु माने, पिचकी माने, गोटू गुणी, पलंगुजी ही दक्षिणेतील काही नावे. सातगोल, सातगोटी, गोगलगाय ही काही मराठी-हिंदी नावे. गुरुपल्यान हे ह्या खेळाचे कोंकणी नाव आहे.

मंकला हा खेळा मध्ये एका आयताकृती फळीवर समोरा समोर ७ असे १४ रकाने कोरलेले असून अश्या पटावर हा खेळ खेळला जातो. प्रत्येक रकान्यात पाच कवड्या असतात. प्रतिष्ठित लोकांकडे हाच खेळ धातू मध्ये नक्षीकाम करून बनवलेला असे. खेळा मधील पासे म्हणून कवडी, रंगीत दगड, कडधान्य, बिया अगदी रत्न देखील वापरली जात. काही जुन्या वास्तूंवर व गड किल्ल्यांवर ह्या खेळाचे अवशेष आजही पाहायला मिळतात. असेच काळ्या पाषाणावरील काही अवशेष आम्हाला दुर्गराज रायगाडावर पहायला मिळाले, त्याचे वास्तव्य तेथे केव्हा पासून आहे हे मात्र अनुमान लावता येत नाही...पण शोध चालू आहे. 

खेळ खेळायला सोपा आणि बुद्धीला चालना देणारा आहे. प्रतीस्पर्धी खेळाडूचे जास्तीत जस्त पासे कमवून हा खेळ जिंकता येतो. अंक मोजणीचा अचूक अंदाज लावत हा खेळ रंगत जातो. एकाग्रता वाढवून हा खेळ लहान मुलांमध्ये गणिता बद्दल गोडी निर्माण करण्यास मदत करतो.

मंकला हा पेरणी खेळ म्हणून देखील ओळखला जातो. खेळ खेळत असताना बिया पेरल्या सारखी क्रिया होते म्हणूनाच कि काय हा कुठल्याही जागी बसून जमिनीवर खड्डे करून तिथलेच दगड उचलून खेळता येतो. त्याच मातीतील कुठल्या ही वस्तूचा उपयोग करून एक सुंदर खेळ जन्म घेतो.

हेच तर वैशिष्ट्य आहे कि मातीशी नाते सांगणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत.... पण त्यासाठी मातीत हाथ घातला पाहिजे... आणि हेच कुठे तरी जमत नाही आहे...    

Thursday, 15 September 2016

बैठे खेळ आणि त्याचे महत्व


आपला भारत देश हा सांस्कृतिक आणि कलाकृतीक विविधतेने नटलेले देश आहे. ह्याच भारतात नवनवीन प्रयोग प्राचीन काळापासून होत आलेले आहेत असे ऐतिहासिक दाखले मिळतात. ह्याच प्रयोगातून साकार झालेले बैठे खेळ आणि त्याची काही वैशिष्ट्ये. प्रचीन भारतात बैठे खेळा मार्फत मनोरंजन होत असे हे जरी खरं असला तरी ह्या खेळांच्या साधनांचा उपयोग अध्यात्मिक शिक्षणासाठी होत असे 'मोक्षपट' हे त्याचे उत्तम उदाहरण होय. कालांतराने ह्याच साधनांचा उपयोग मानसिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी होऊ लागला.

भारतात ह्या बैठ्या खेळांचे महत्व पौराणिक कथां मधून सांगण्यात आलेलं आहे. रिगवेदातील १४ अध्याया मध्ये ‘अक्ष सुक्त’ ह्या अध्यायात 'पट' व त्यातील पास्यांचा उल्लेख आढळतो. अगदी महाभारतात ज्या खेळामुळे रणसंग्राम झाला तो खेळ म्हणजे 'पट' किव्हा 'पचिसी'. प्राचीन मंदिरावरील शिल्पात किव्हा शीलालेखात अश्या बर्याच बैठ्या खेळांचे संदर्भ सापडतात ह्या वरूनच आपण ह्या खेळांचे त्या काळातील महत्व जाणु शकतो. जिथे 'चदुरंग' आणि 'पचिसी' राजा महाराजांचा खेळ जाणला जायचा तिथेच 'बाघचाल' किव्हा 'चाल्ल्सआठ' हे खेळ सामान्य वर्गात प्रचलित होते.

ह्या बैठ्या खेळांची विविधता आणि त्या खेळांची वैशिष्ट्ये

मंकला, सातगोल, गोगलगाय – अंक मोजणी खेळ
चदुरंग – युद्धनीती डावपेच
पचिसी, चौकाबारा  – अध्ययन क्षमता
नावकंकारी – संरेखान खेळ
अडूहुली – डावपेच
मोक्षपट, वैकुन्ठ्पल्ली – अध्यात्मिक शिकवण


त्या काळात मनोरंजनाचे एक साधन असलेले बैठे खेळ हे अध्यात्मिक शिक्षणा बरोबर प्रत्येकाचे मानसिक व बौद्धिक सश्क्तीकरण करत असत. मंकला हा खेळ लहान मुलांमध्ये गणितातील अंक मोजणी सुधारू शकतो. इतर खेळ अध्ययन व बौद्धीक क्षमता वाढवू शकतात.

अल्झायमर आणि डीमेंशिया सारख्या मानसिक आजारावर हेच बैठे खेळ एक उपचार पद्धती म्हणून काम करतात. ह्या खेळा मुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्रीय राहता. इंग्लंड मध्ये ह्याच बैठ्या खेळांना मानसिक उपचार पद्धती मध्ये मान्यता मिळालेली आहे. 

कळाच्या पडद्या आड लुप्त झालेले हे खेळ पुनर्जीवित करून प्रत्येकाने हे खेळायला हवे आणि तसं हि तासं तास टीवीचा रिमोट दाबत बसण्यापेक्षा हे बैठे खेळ खेळण्यास काय वाईट आहे. चला तर मग.....        

Wednesday, 20 July 2016

कवडी


नाही खर्चीली कवडी दमडी नाही वेचीला दामकिव्हा कवडी के मोलह्या मधील कवडी जे एके काळचं चलन म्हणून ओळखलं जायचं त्या बद्दल थोडसं. कवडी किव्हा संस्कृत मध्ये 'कपर्दिका' व इंग्रजीत COWRIE SHELLS हे समुद्रात सापडणारे एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच. कवड्यांचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. १८ व्या शतकापर्यंत कवडी हे चलन जगभरात वापरात होतं मग तांब्यांच्या नाणी ह्यांनी  त्याची जागा घेतली. भारता मध्ये १ रुपया चा भाव २५६० कावडी असे. व्यापार उदीम करतना कवड्यांचा वापर सरस होत असे. मुख्यता परकीय चलन ह्या मध्ये होणारे बदल आणि जागतिक बाजारात होणारी उलाढाल ह्या मध्ये कवड्यांचे फार महत्व असे. 

कवड्यांचे ज्ञात असलेले प्रकार म्हणजे साधी कावडी, लक्ष्मी कवडी, विष्णू कवडी आणि राजा कावडी. राजा कावडी हि आकाराने इतर कवडी पेक्षा मोठी असते. तुळजापूर शहरात नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्‍या माळांची शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली जातात. अनेक आराधी, आराधिनी महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना दिसतात. कवड्यांमध्ये अंबुकी कवडी व येडाई कवडी असे दोन प्रकार देखील पाहायला मिळतात.

कवडी म्हणजे एके काळचे धन आणि इथून सुरु होतो ह्या कवड्यांचा बैठ्या खेळा मध्ये होणारा वापर. सारीपाट, चौपर, चतुरंग इत्यादी बैठ्या खेळा मध्ये कवड्यांचा वापर होत असे.

बैठ्या खेळा मध्ये कवडीच्या दानाचे नियम

कुठल्याही खेळाची सुरुवात दोन पक्षांमध्ये पट मांडून आपापल्या सोंगट्या निवडून करतात. सहा कवड्या हातातील मुठीत घेऊन खळखळून जमिनीवर पसरावयाच्या याला दान घेणे असे म्हणतात. मग पालथ्या किती व उताण्या किती पडल्या यावर किती गुण मिळाले हे पाहण्यात येत असे.

६ कवड्या पालथ्या असल्यास १२ गुण
१ कवडी उताणी व ५ कवड्या पालथ्या पडल्यास १० गुण
१ कवडी पालथी व ५ कवड्या उताण्या पडल्यास २५ गुण
२ कवड्या उताण्या व बाकीच्या ४ पालथ्या पडल्यास २ गुण
३ उताण्या व ३ पालथ्या पडल्यास ३ गुण
४ उताण्या व २ पालथ्या पडल्यांस ४ गुण

अश्या प्रकारे गुण मिळवून बैठे खेळ खेळले जात. दान टाकण्यासाठी अजून एक वस्तू वापरत असत ती म्हणजे पासे किव्हा DICE ज्याचा संदर्भ हरप्पण कळात सापडतो. कावडयांचे खेळ कालबाह्य झाले पण आजही कवड्याची माळ घालूनच अंबाबाई देवीचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा गातात व दान मागतात.
  


Tuesday, 19 July 2016

मोक्षपट

प्राचीन भारतात बैठ्या खेळांचं महत्व आणि त्यांच्या पद्धती ह्याचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने जो खेळ आपल्या समोर येतो तो म्हणजे मोक्षपट, मोक्षपटम किव्हा परम पदम. हा खेळ भारतात सुमारे १३ व्या शतकात बनवण्यात आला. ह्या खेळाचे जनक होते प्रसिद्ध कवी संत आणि भागवत धर्माचे प्रवर्तक संत ज्ञानदेव महाराज. अध्यात्म आणि तत्वज्ञानाविषयक विचार रुजवण्यासाठी त्यांनी ह्या खेळाची निर्मिती केली असे दिसून येते. ह्या खेळामध्ये शिडी ही आपल्या मधील गुणांद्वारे मिळालेल यश दर्शवते आणि साप हे आपल्या दुर्गुणां मुळे मिळालेली क्षती दर्शवते. आपण चांगलं काम केलं की चांगलं फळ मिळतं आणि वाईट वृत्ती मुळे आपल्या मध्ये प्रगती होत नाही ही शिकवण ह्या माध्यमातून देण्यात येत असे. मोक्षपटम खेळत असताना मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ करून अनंतात विलीन होण्याचा मार्ग ह्यात दर्शवलेला दसतो.
  
कालांतराने ह्या खेळामध्ये बदल होत गेले तशी त्याची  नावे देखील बदलत गेली "ज्ञान चौपर" व "वैकुंठपल्ली" ह्या नावाने देखील हा ओळखला जातो. कपड्यावर बनवलेला हा खेळ कवडी आणि पासे ह्यांनी खेळला जाई. काळ बदलला आणि ह्या खेळाचं  महत्व संपुष्टात आलं. ब्रिटिश राजवटीत सुमरे १८९२ साली तो भारता बाहेर गेला आणि नव्या नावारूपाने आपल्या सर्वांसमोर आला तो म्हणजे Snakes and Ladder अर्थात साप शिडी आणि आता आपण त्याला ह्या नावाने ओळखतो. नवीन रूपात आपल्याला फक्त अंक मोजणी पहायला मिळते त्या मधील मूळ उद्देश बाजूला पडला आणि आपण ह्या खेळाला आता फक्त एक TIMEPASS  म्हणून पाहतो  इतकच.