Monday, 5 February 2018

खेळांची संतवाणी


खेळांची संतवाणी 
अब्बक, तुब्बक, तीक्कम, तुल, चौबक, पंचक विट्टी गुल असे कोणी म्हटले कि लागेचच आपल्याला ‘विटीदांडू’ हा मराठी चित्रपट आठवतो. ह्या चित्रपटात एक सुंदर वाक्य आलं आहे “जर आपण विटीदांडू हा खेळ टिकवला असता तर जागतिक स्थरावर ह्याचे सामने झाले असते आणि क्रिकेट ऐवजी आपण हा खेळ खेळत असलो असतो पण”.... पण खरच काळ बदलत गेला आणि हे सर्व खेळ मागे पडत गेले. केवळ ह्या खेळामुळे अपघात होतात म्हणून हा खेळ बाजूला पडला. अपघात कुठल्या खेळात होत नाही? पाश्चात्य लोकांचे अनुकरण करणारे आपण आपल्या सांस्कृतिक परंपरा वाढीस का न्हेऊ शकलो नाही हा विचार पडतो. संत वांगमयात ज्या खेळाचे वारंवार उल्लेख येतात त्या मध्ये एक म्हणजे संत तुकाराम महाराज ते म्हणतात

बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥
विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥
हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥
सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥ 
तुका ह्मणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥
अर्थ : तुकोबाराय ऊपदेशपर लिहीतांना म्हणतात की तुमची बालपणीची बारा वर्षे सहजच अशी विवीध खेळ खेळता खेळताच गेली.बालपणी कोणते खेळ खेळले जात होते त्याची यादीच तुकोबाराय देतात.विटी दांडू,चेंडू लगोरी,चंपे पेंड,एकीबेकी या बरोबरच हमामा, हुंबरी तसेच भोवरे सुद्धा खेळले जायचे. पुढे खेळाची माहीती देतांना तुकोबाराय लिहीतात की सेलडेरा आणि निसरभोवंडी म्हणजेच घसरगुंडी एकमेकांना ऊचलण्याचा खेळ सुद्धा खेळला जायचा.
तुकोबांच्या बालपणीच्या ह्या खेळाचा उल्लेख त्यांच्या अभंगात स्पष्ट दिसतो आणि त्याच बरोबर इतर खेळांचा देखील उल्लेख ह्यात आहे. अभंगातील शेवटची ओळ वाचली तर कळतं कि जे बालपण आनंदात खेळण्यात, बागडण्यात घालवलं तेच सर्व तारुण्य आल्यावर गर्वामुळे वाया गेलं.
दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात
माग विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥
कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥
एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥
राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥
पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥५॥
एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥६॥
तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥७॥

अर्थ : गड़यानो, हा विटीदांडूचा खेळ ज़रा बाजूला ठेवून आपण दूसरा एखादा खेळ खेळु. पुष्कळ डाव आंगावर आले. या प्रपंचरूपी खेळात आपले पाय कुठेच् स्तिर राहिले नाही (वधूपितारूपि) एक गड़ी (कन्यारूपी) वीटी कोलून तिला (लग्नरूपि) टोला मारतो. दुसरा (जावाईरुपि) गड़ी ती झेलतो, त्याने ती वीटी झेलली आहे, तोच या डावात गुंततो, डावात आलेल्या लग्न झालेल्या त्या स्त्रीसह सारे एकमेकांना हका मारतात. कधी हृदयाला सलनारे बोल बोलतात. एखादा गड़ी पळून जायला लागल्यावर त्याला पकडून ठेवतात एकदाकी या प्रपंचिक गड्यांच्या रांगेत नाव लागले की जन्म-मृत्यु च्या फेऱ्या आणि संपत्तिचि हाव कधीच चुकत नाही या रांगेत मुलगा, नातू, पंतू हे पुढे असतात व बाप, आजोबा, पंजोबा हे गड़ी मागे असतात. एकमेकांच्या पालनपोषणाचा दोघानाहि प्रयत्न करत राहावा लागतो. विटीदांडूच्या या खेळाविषयी काहींच्या मनात फार हाव्यास असतो. त्यामुळे धनलोभाकडे धाव घेतात. त्यातून थोडाफार फायदा झाला की आनंदाने टाळ्या पिटतात. तुकाराम महाराज म्हणतात, आता हां खेळ सोडा आणि दुसरा खेळ मांडा.संसाररुपी प्रपंचाला विटीदांडूची दिलेली उपमा सुंदर प्रकारे मांडली आहे.
जनाबाईंच्या अभंगातसुद्धा एके ठिकाणी एका बैठ्या खेळाचा उल्लेख येतो त्या म्हणतात

मांडियेला खेळ । रंग बुद्धिबळ ॥१॥
कैंचा शह आला । प्याद्याखाली फजीं आला ॥२॥
शहबाजू आली । जनी म्हणे मात केली ॥३॥

रंग बुद्धिबळ म्हणजे चदुरंग किव्हा चतुरंग व कालांतराने अपभ्रंश झालेला शतरंज हा खेळ ज्या मध्ये प्यादा हा उंटाला मारतो आणि शह झालेली बाजू मांडलेली दिसते.
टिपऱ्या हा देखील एक प्राचीन खेळ आहे भगवान श्री कृष्ण देखील गोपगोपिसोबत रासलीलेत टिपऱ्या खेळल्याचे वर्णन आढळतात. टिपरी ह्या खेळाविषयी तुकोबारायांच्या गाथेत सहा विस्तृत अभंग आहेत.
खेळसी टिपर्‍या घाईं रे । वाचे हरिनाम गाई रे । 

टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥ 
     
विटीदांडू असो किव्हा इतर कुठला हि खेळ असो, लहानपणी खेळलेल्या ह्या खेळाचे प्रत्येकाशी अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे. एका विद्यमान सिव्हील अभित्यंता ह्यांनी त्यांच्या बालपणीची सांगितलेली गोष्ट आठवते ते म्हणत होते कि “आजही अमुक एक अंतर जर नजरेने मोजायचे असेल तर ते किती फुटाचे आहे ते मी अचूक सांगू शकतो आणि अशी नजर केवळ विटीदांडू हा खेळ देऊ शकतो”. खरंच इतक्या प्रगत झालेल्या ह्या सर्व गोष्टी कुठे तरी जुन्या खेळांशी संबंधित आहे तेव्हा त्या सर्व खेळाचा आपल्यावर होणारे सकारात्मक परिणाम पाहून अभिमान वाटतो. आपण हे सर्व खेळ खेळलो आहोत आणि संत परंपरेने चालत आलेला हा वारसा आपण टिकवायला हवा. आता खरी गरज आहे ते फक्त पुढच्या पिढीला हा वारसा सुपूर्द करण्याची .           

आट्यापाट्या


आट्यापाट्या

शारीरिक व्यायाम ज्या मध्ये धावणे हा एक महत्वाचा घटक मानला जातो आणि ज्या खेळां मध्ये ह्या धावण्याचा समावेश होतो तो म्हणजे आट्यापाट्या. मुलांचे शारीरिक स्वास्थ्य अधिक बळकट करण्यासाठी व्यायाम हा हवाच आणि आट्यापाट्या ह्या खेळांमध्ये धावणे, हुलकावणी देणे, अडवणे ह्या मुळे सर्व शारीरक हालचाली होतात. आट्यापाट्या हा मैदानी खेळ असून एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेत (पट्टीत) अडविणे व अडवलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटणे अशी रुपरेषा असलेला हा महाराष्ट्रातील खेळ आहे. पूर्वी ह्या खेळासाठी सर्वसामान्य नियम नव्हते. पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने ह्या खेळा मध्ये सुधारणा करत १९१४ साली अधिकृत व नियमबद्ध अखिल भारतीय सामने सुरु केले. १९१८ मध्ये बडोदा येथील हिंदविजय जिमखान्याने देखील काही वेगळे नियम लागू केले. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने ह्या खेळला आधुनिक, आकर्षक, संघटीत अ शिस्तबद्ध स्वरूप दिले. आता ह्या नियमानुसारच हा खेळ सर्वत्र खेळला जातो. सूर-पाती, लोन-पाती, दर्या-बंध, सारागरी, सारामणी, तिल्ली, उप्पीनाट, उप्पू-पत्ती, चौपाल-पाती, पंचवटी, चिक्का आदी विविध नावांनी हा खेळ खेळला जातो. आदिवासी भागात ह्या खेळला ‘लाभ’ म्हणून संबोधले जाते. तामिळनाडू राज्यातील पुरातन तामिळ साहित्यात या खेळाचे किलीथाटूअसे नमूद केलेले आहे अजूनही तिथे शेतामध्ये हा खेळ खेळला जातो. संत तुकाराम ह्यांच्या काळात हा खेळ प्रचलित होता असे त्यांनी केलेल्या त्यांच्या अभंगातून व्यतीत होतं.

आट्यापाट्यांचे क्रीडांगण नियमानुसार सुरपाटी व इतर नऊ पाट्यांत विभागलेले असतात. खेळ जिथून सुरु होतो त्या पाटीला कपाळपाटी असे म्हणतात. शेवटच्या पाटीला लोणपाटी असे म्हणतात. सर्व पाट्यांना दुभागून जाणाऱ्या पाटीस सुरपाटी किवाह मृदुंगपाटी असे म्हणतात. खेळाडूंचे दोन संघ असतात व त्यात प्रत्येकी नाऊ खेळाडू असतात. खेळीत खेळणारे (लोणवाले) कपाळपाटीकडून लोणपाटीकडे खेळत जाऊन लोणपाटीकडून उलटून कपाळपाटीकडे खेळत येतात. त्यांनी कपाळपाटी ओलांडली, की लोण होते. प्रतिपक्षातील खेळाडू (पाटीवाले किंवा पाट्या धरणारे) पाट्यांवर उभे राहून लोणवाल्यांना अटकाव करून लोण न व्हावे असा प्रयत्न करतात. लोणांवरच डावाचा निर्णय अवलंबून असतो. सूरवाल्याला प्रतिस्पर्ध्यास चोहोंकडून कोठेही मारता येते; पण पाटी धरणाऱ्या खेळाडूस मात्र प्रतिस्पर्धी मागच्या घरात गेल्यानंतर मारता येत नाही.

१९४८ मध्ये या स्पर्धा फार मोठय़ा प्रमाणात पार पडल्या. मात्र त्यानंतर म्हणजे १९४८ नंतर अखिल भारतीय स्तरावर या खेळाला लोकप्रियता किंवा मान्यता मिळवून देण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. याचा परिणाम असा झाला की अतिशय वेगवान, आकर्षक आणि चुरशीचा असा हा खेळ स्पर्धा जगाच्या व्यासपीठावर मागे पडला. अजूनही अगदी मोजक्या ठिकाणी लहान लहान मंडळे या खेळाचे सामने आयोजित करतात. इतक्या मर्यादेपर्यंत हा खेळ मागे पडला.

आटय़ापाटय़ा खेळातील काही नामवंत खेळाडू तसेच या खेळाविषयी आस्था असलेले क्रीडाप्रेमी एकत्र आलेया खेळाचे पुनरुज्जीवन करून त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्याच्या हेतूने त्यांनी १९८२ मध्ये दिल्ली येथे सभा घेतली. याचा परिणाम म्हणून १९८२ मध्ये पहिल्यांदा आशियाई खेळांदरम्यान आटय़ापाटय़ा फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. तब्बल ३४ वर्षांच्या खंडानंतर या खेळाच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आणि १९८२ मध्ये पहिली राष्ट्रीय आटय़ापाटय़ा स्पर्धा झाली. आटय़ापाटय़ा फेडरेशन ऑफ इंडियाला आटय़ापाटय़ा खेळाचे मूळ इतर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात आढळले. दिल्ली, हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर, ओरिसा, केरळ, गोवा आणि इतर अनेक ठिकाणी हा खेळ रुजविण्यास मदतच झाली.
हा खेळ मनोरंजक, भरपूर व्यायाम करून देणारा व बिनखर्ची आहे. वैयक्तिक चापल्य व सांघिक कौशल्य यांची कसोटी यात लागते. तसेच शारीरिक व मानसिक अनुसंधानाचेही शिक्षण ह्या खेळामुळे मिळते.

संदर्भ : मराठी विश्वकोश ० धारूरकर. य. ज, लोकसत्ता नाशिक वृतांत